सोलापूर जिल्हा येथे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे काही भागांतील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी उभी पिके आडवी झाली असून शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे.
सध्या रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, कांदा आणि भाजीपाला पिकांसह द्राक्ष व डाळिंब यांसारख्या फळपिकांनाही या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. काढणीस आलेली पिके पावसामुळे भिजल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी, दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप व भंडारकवठे तसेच मंगळवेढा तालुक्यातील काही भागांमध्ये पावसाची नोंद झाली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार २३ ते २८ फेब्रुवारी दरम्यान आणखी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांतच हातात येणारे उभे पीक निसर्गाच्या अवकृपेने बाधित झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
गेल्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजावर आता अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा संकट कोसळले आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे
