सोलापूर : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ६८ पैकी ३८ जागा जिंकत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले असून आता सर्वांचे लक्ष अध्यक्षपदाच्या निवडीकडे लागले आहे. यंदाचे जिल्हा परिषद अध्यक्षपद ओबीसी सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असल्याने इच्छुकांची संख्या वाढली असून राजकीय वर्तुळात अनेक नावांची चर्चा रंगू लागली आहे.

अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव गटातून विजयी झालेल्या शांभवी सचिन कल्याणशेट्टी यांच्या नावाची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी असलेले सलोख्याचे संबंध, तसेच पक्षवाढीसाठी केलेले संघटनात्मक काम सोलापूर महानगरपालिका जिल्ह्यातील नगरपालिका सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती या निवडणुकीमध्ये पक्षाला मिळालेला घवघवीत यशामुळे जिल्ह्यात सचिन कल्याण शेट्टी यांचा करिष्मा अधिक घट्ट झाली आहे . यामुळे शांभवी कल्याणशेट्टी यांचे पारडे अध्यक्षपदासाठी जड मानले जात आहे. सुशिक्षित आणि अभ्यासू प्रतिमा असलेल्या शांभवी यांना पक्षश्रेष्ठींकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तथापि, अध्यक्षपदासाठी इतरही अनेक नावे चर्चेत आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग गटातील रामप्पा चिवडशेट्टी, मंद्रूप गटातून विजयी झालेल्या माजी सभापती सोनाली कडते, बार्शी तालुक्यातील उपळे दुमला गटाच्या भारती दराडे, तसेच सांगोला तालुक्यातील चोपडी गटातील चेतनसिंह केदार यांची नावे पुढे येत आहेत.
याशिवाय बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे गटाचे दीपक वैद्य, उत्तर सोलापूर तालुक्यातील नानज गटातील चैताली मुळे, मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथून विजयी झालेले बालाजी नरोटे यांच्यासह इतर ओबीसी सदस्यांचीही नावे चर्चेत आहेत.
जिल्ह्यातील ६८ पैकी १८ गट ओबीसीसाठी आरक्षित आहेत. भाजपकडून निवडून आलेल्या सात ते आठ प्रमुख ओबीसी सदस्यांपैकी एकाची अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता आहे. अध्यक्षपद हे ओबीसी सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्याने पुरुष किंवा महिला कोणालाही संधी मिळू शकते. त्यामुळे महिला उमेदवारांच्या नावांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान, अक्कलकोट किंवा बार्शी तालुक्याला अध्यक्षपदाची लॉटरी लागेल, असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. अंतिम निर्णयात पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगू लागली आहे.
बहुमत मिळवल्यानंतर भाजपसमोर आता नेतृत्वाची निवड हा पुढचा महत्त्वाचा टप्पा आहे. अध्यक्षपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

