जेऊरवाडी शिवारात बिबट्याच्या वावराची चर्चा; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण, वनविभागाचे सतर्कतेचे आवाहन

अक्कलकोट | प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील जेऊरवाडी गावाच्या शिवारात बिबट्या वावरताना दिसल्याची चर्चा पसरल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच गावातील सतर्क नागरिकांनी वनविभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधत परिस्थितीची माहिती दिली.
माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली. जमिनीवर आढळलेल्या पायांच्या ठशांची तपासणी करण्यात आली. प्रथमदर्शनी हे ठसे बिबट्याचे नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले असले, तरी बिबट्याच्या वावराची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना सांगितले की, बिबट्या प्रामुख्याने शेळ्या, मेंढ्या, कुत्रे आणि वासरे यांसारख्या पाळीव प्राण्यांवर हल्ला करतो. मात्र काही वेळा रात्री किंवा पहाटे एकटे जाणारे लोक, लहान मुले तसेच शेतात काम करणारे शेतकरी व उसतोडणी मजूर यांच्यावरही हल्ल्याच्या घटना घडू शकतात. विशेषतः उसाच्या शेतात बिबट्याला लपण्यासाठी सुरक्षित जागा मिळत असल्याने अशा भागात धोका अधिक असतो.
जंगलातील अधिवास कमी होणे आणि अन्नाची कमतरता यामुळे बिबटे अन्नाच्या शोधात मानवी वस्त्यांच्या जवळ येतात. बिबट्याचा स्वभाव पळणाऱ्या शिकारीचा पाठलाग करण्याचा असल्यामुळे अचानक समोर आल्यास पळू नये, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
ग्रामस्थांनी काही खबरदारी घेतल्यास संभाव्य धोका टाळता येऊ शकतो. रात्री एकटे फिरणे टाळावे, शक्यतो समूहाने फिरावे, टॉर्चचा वापर करावा आणि मोठ्याने आवाज करत चालावे. जर बिबट्या दिसला तर पळण्याऐवजी शांत राहून मोठ्याने ओरडावे आणि हात वर करून स्वतःला मोठे दाखवावे, असे मार्गदर्शन करण्यात आले.
दरम्यान, वनविभागाचे अधिकारी सोनटक्के यांनी ग्रामस्थांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून गावात सतर्कता ठेवावी आणि संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ वनविभाग किंवा स्थानिक प्रशासनाला माहिती द्यावी, असेही त्यांनी सांगितले.
या घटनेनंतर शेतकरी वर्गातही काही प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.