धनशेट्टी यांच्या कार्याचा गौरव; सेवानिवृत्ती सोहळ्यात जलजीवन मिशनच्या यशाची दखल
सोलापूर | प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्यांचा सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, महिला व बालकल्याण सभापती अॅड. अमृता वाघे, कृषी व पशुसंवर्धन सभापती रामप्पा चिवडशेट्टी, तसेच जिल्हा परिषद सदस्य व अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जलजीवन मिशनला गती देणारे नेतृत्व
मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी आपल्या मनोगतात धनशेट्टी यांच्या कार्याची विशेष दखल घेतली. निधीच्या अडचणी असूनही त्यांनी जलजीवन मिशनची कामे प्रभावीपणे पूर्ण केली. तब्बल २४० कामे पूर्ण करताना टँकरची संख्या २१४ वरून ६९ पर्यंत घटविण्यात यश मिळाले, हे त्यांच्या कार्यक्षमतेचे द्योतक असल्याचे त्यांनी नमूद केले. गावपातळीवरील समन्वय, ठेकेदारांशी संवाद आणि धाडसी निर्णयक्षमता यामुळेच ही प्रगती शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.
‘काम पूर्णत्वास नेणारे अधिकारी’
उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी धनशेट्टी यांच्या कार्याचा गौरव करताना उत्तर सोलापूर तालुक्यातील त्यांच्या योगदानाचा विशेष उल्लेख केला. “हातात घेतलेले काम तडीस नेणारे अधिकारी” अशी त्यांची ओळख असल्याचे त्यांनी सांगितले. अॅड. अमृता वाघे यांनीही मनोगतातून त्यांच्या पुढील आयुष्यास शुभेच्छा दिल्या.
अध्यक्ष दीपक वैद्य यांनी जलजीवन मिशन ही दिशा दर्शक योजना असल्याचे सांगत, या योजनेच्या यशात धनशेट्टी यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे अधोरेखित केले.

सीईओ कुलदीप जंगम यांचाही सन्मान
याच कार्यक्रमात राज्यस्तरीय ‘सेवाकर्मी’ पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचा देखील सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेने १०० पैकी ८० गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून, जिल्ह्याची मान उंचावण्याचे काम जंगम यांनी केल्याचे यावेळी सांगण्यात आले. अध्यक्ष दीपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्या हस्ते त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
सुत्रसंचालन व आयोजन
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले, तर स्वागत वरिष्ठ सहाय्यक रणजित घोडके यांनी केले. विविध तालुक्यांतील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.