ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची प्रसाद काटकर यांच्याकडे कार्यकारी अभियंत्याची धुरा

सोलापूर : जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या जागी मंगळवेढा तालुक्यातील उपअभियंता प्रसाद अंतराव काटकर यांच्याकडे कार्यकारी अभियंत्याचा पदभार सोपविण्यात आला आहे. काटकर यांच्यावर मंगळवेढा तालुक्याचे उपअभियंता पद सांभाळत असतानाच जिल्हा स्तरावरील अतिरिक्त जबाबदारीही सोपविण्यात आली आहे.
काटकर यांच्या निवडीबद्दल अक्कलकोटचे उपअभियंता विद्याधर राठोड, वरिष्ठ सहलेखा अधिकारी प्रकाश शेंडगे, कनिष्ठ सहाय्यक गणेश साळुंखे तसेच कॉन्ट्रॅक्टर माऊली पवार, अमोल कोकरे व ओम बुरशे यांनी शुभेच्छा दिल्या.
सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी यांनी आपल्या कार्यकाळात ‘जलजीवन मिशन’ योजनेची अंमलबजावणी अत्यंत प्रभावीपणे करत विभागाला नवी दिशा दिली. कोणतीही तक्रार नोंद न होता, अनेक प्रलंबित प्रश्न त्यांनी कौशल्याने मार्गी लावले, ही त्यांच्या कार्याची विशेष नोंद आहे.
दरम्यान, नव्याने पदभार स्वीकारलेल्या प्रसाद काटकर यांच्यासमोर ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत अपूर्ण कामे पूर्ण करणे, तसेच ठेकेदारांकडील प्रलंबित कामांचा निपटारा करणे ही मोठी आव्हाने असणार आहेत. त्यांच्या अनुभव आणि कार्यक्षमतेच्या जोरावर ही आव्हाने ते यशस्वीरीत्या पार पाडतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
ग्रामीण भागातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम व सुस्थितीत ठेवण्यासाठी काटकर यांना आता महत्त्वाची भूमिका बजावावी लागणार असून, त्यांच्या पुढील कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.